Disclaimer : सदर लिखाण हे लेखकाचे वैयक्तिक मत, काल्पनिक आणि काही प्रमाणात स्व:नुभवातून लिहिले गेले असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

Saturday, April 25, 2026

युगपुरुष

पुर्वार्ध

सुमंगल–सुमधुर-उत्साही वातावरण. साधारणसे गाव-माणसं कुठले तरी. त्या वातावरणात नवोदित जोडपे सात फेऱ्या घेतायंत. जेवणाच्या पंगती मध्ये रेलचेल चालूये. पाहुणे मंडळी जेवणं उरकतायंत, घरची काही मंडळी आहेर करतायत किंवा त्यातले काही जेवणाऱ्यांना आग्रह करतायंत आणि ज्यांना काहीच करायचं नाही ते समोर बसून फक्त ही कितवी फेरी झाली हे मोजातायंत. जे प्रत्येक लग्नात चालत ते इथे पण चालूये. अगदी बिनबोभट, यांत्रिक हालचाली, नुसार अगदी ठरल्याप्रमाणे. हं अपवाद फक्त एकाच गोष्टीचा. काही नाही, सप्तपदीच्या प्रत्येक फेरीला एक लहान मुलगा नवऱ्या मुलीच्या सोबतच चालत होता. एका फेरीला त्याला बाजूला ओढावं तर हा कुठूनसा येऊन दुसऱ्या फेरीला हजर! कोणी त्याला प्रेमाने समजावे, कोणी रागाने बोलावे पण करत महा डॅम्बीस. कशालाच बधेना. साम-दाम-दंड-भेद शेवटी त्यानेच निर्णय घेतला, नववधूचा साडी पदर पकडला आणि जिवाच्या आकांताने ओरडला “मी अक्का ला सोडून कुठेच जाणार नाही”.

फार तर फार ५-६ वर्षांचं पोरगं असेल ते पण नव्या नवरीचा लहान का होईना भाऊ प्रत्येक सेकंदाला सोबत म्हणजे चर्चेला विषयंच की हो. बहुतांश जणांना हे लग्न याच एका कारणाने आठवणीत राहील बहुदा. पण त्या लेकराचा यात काही दोष नाही. त्याच नशीबंच उघड. तो आपल्या जन्मदात्यांना फक्त फोटोतच पाहणार होता. पैकी आई चा फोटो नाही काढला म्हणे कधीच. हां वडील कोणाकडे तरी कारकुणीस होते तेव्हा नोकरी निम्मित का होईना त्यांचा फोटो काढला होता फक्त. ब्लॅक अँन्ड व्हाईट चा तो काळ. सामान्य माणसाकडे अठरा विश्व दारिद्र्य म्हणून गरिबी जन्मतः भेट म्हणून घेऊन आला होता तो. त्यात तीन बहिणीनं पाठचा एककूलता एक भाऊ हा. त्याच नशीब उघड पण त्याच्या या अक्का ने मात्र नशीब उघडलं होत. सरकारी नोकरीस तुडवडा नसे त्या काळी म्हणून चांगला देखणा, तरतरीत राजबिंडा तरुण तिने जोडीदार म्हणून निवडला होता. झालं. सप्तपदी-कानपिळीनी-सुनामुख-विहीन भोजन अन नवरीला वाटी लावण्याची वेळ पण हे कार्ट काही हटेना. शेवटी त्या तरुणानेच निर्णय घेतला. त्या पोराविषयी असलेली चीड, दया, कीव त्याला लोकांच्या नजरेत बघवेना बहुदा. तरुणाने भर मंडपात आपल्या एकुलत्या एक मेव्हण्याला आणि त्याच्या नशिबाला आपल्या कडेवर उचलून घेतलं.

पोरगं आता मोठं झालं होत. त्याला एक नाव सुद्धा देण्यात आलं. मिलिंद! अक्काचा मिलिंद. त्याच्या अक्का कडेच वाढला. शिकला. नोकरीला लागला. नाही नाही . . . लावला. त्यात ही याच तरुणाचा सिहांचा वाट. परीक्षेचा फॉर्म हि यानेच भरला. पुढे मुलाखतीची तयारी घेतली. पहिल्या पोसिंग ची जागा जवळंच मिलीवि म्हणून देखील याचाच खटाटोप. धरणग्रस्त म्हणून सरकारी कारकुनास यानेच जागा मिळवून दिली. पुढे लग्न लावून दिल. कर्म-धर्म संयोगाने दोन पोरं मिलिंदच्या पदरी आली. एवढंच नव्हे त्या तरुणाने आपल्या बायकोच्या “माझ्या भावासाठी घर पाहणार असाल तरंच आपलं घर बुक करा” या हट्ट पायी मिलिंदच्या घराची रजिस्ट्री पावती सुद्धा भरली.

दिवस बदलले. ती नववधू आता आमची आत्या झाली होती आणि तो तरुण आमचे मामा. या सर्व धामधुमीत त्या तरुणाचं काय झालं? त्याच्या आयुष्यात काय चालू होतं? बरं त्याच नाव तरी काय?

 

उत्तरार्ध

“शिवनाथ पुरुषोत्तम काळवीट”. सिर्फ नाम ही काफी है! या नावातच तुम्हाला पूर्वार्धाचा सारांश सापडेल. काळवीट मामा सापडतील. बालपणी दिवाळीत भाऊबीज किंवा एखाद्या वेळेस राखीपौर्णिमा या दिवशीच आत्या कडे जाणे व्हायचे. फार-फार तर २-३ दिवस राहायचो. पण ते ही दिवस कसे काटतील असं व्हायचं. कधी-कधी तर “आत्या कडे जायचं आहे” असं बाबा म्हणाले जरी तरी मला रडू यायचं. का? असं म्हणून काय विचारतयं? अहो काळवीट मामा म्हणजे साक्षात ‘शिव’! ते समोर दिसत समोरचा माणूस तांडव करी. नजर तीक्ष्ण, काळजाला भेद देणारी. घरी २४ तास बडदास्त शिस्तेचं वातावरण. मोठ्या आवाजात बोलण्यास सक्त मनाई. त्यांचा संपूर्ण दिवस कसा आखीव-रेखीव कार्यक्रम. राग तर असा, की एका नजरेत समोरच्याच काळीज हाती येई. मुळचे घारे डोळे अजून समोरच्या गपगार करीत. “टेरर का दुसरा नाम काळवीट मामा” असं पालुपद आम्हा आते-मामा भावंडात प्रचलित असे. खरी सत्वपरीक्षा तर जेवणाच्या पंक्ती ला येई. आम्ही पोरं पण फार टरकून असू की आज आम्हाला जेवायलाच न मिळो! पण नशीब पार आडवं हो. नेमकं आम्हा पोरांच्या पंक्ती ला 'शिव' 'दत्त' म्हणून उभे! त्यात आमच्या मुंजी झालेल्या. “ज्यांना ज्यांना चित्रवती घालता येतात त्यांनीच फक्त जेवायला बसा.” पहिला आदेश. “वदनी कवळ घेता म्हणता आले नाही तर एक घास गिळायचा नाही.” दुसरा आदेश. अश्या आदेशाच्या फैरी चालुच. शिवाय, “लागेल तेवढेच घ्या. नाहीतर उरलेलं डोक्यावर थापा किंवा तुमच्या माईच्या पदरात बांधा.” अशी बोलणी होतीच तोंडी लावायला. त्यांची स्वतःची ४ पोरं त्यांच्या समोर यायला घाबरायचे तर आमची काय कथा! मिळालं उत्तर की का नाही जायचं आत्या कडे? नकोच ते.

पण तरी आम्ही आत्या कडे जायचो. कारण ती स्वतःच होती. आमच्यासाठी आत्या-मामा म्हणजे उत्तर-दक्षिण ध्रुव. मामा जेवढे कडक आत्या तेवढी प्रेमळ. भावाची पोरं ही तिला तिच्या नातवंडं प्रमाणेच. तेव्हा काकणभर का होईना तिची ओंजळ आमच्यासाठी कायम जास्त भलेली असायची. मामांविरुद्ध बंड पुकारण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. जस की उलट बोलणे, ना बोलणे, त्याच्या समोरच ना जाणे. परंतु तिर्थरुपांनी ते सर्व प्रयत्न शब्दशः ‘हाणून’ पाडले. असे हे काळवीट मामा. मला वाटायचे, अरे हा माणूस असा कसा? याच्या उत्तरादाखल आणि एकदा पूर्वार्ध ऐकवला. गरम शिसाचा रस कानी पडला. परिस्थती माणसाला आतून किती ओरबाडते ना. रागीट बनवते. कर्मठ बनवते. शिस्तबद्द बनवते. मामांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता काळानुरूप बदलला होता.

खरं तर प्रत्येक कुटुंबाचा आधार म्हणजे बाप. पण बापाचा पण कोणी आधार असेल तर? जर बाप डोंगर तर डोंगरालाही व्यापणारी असतं आभाळ. आभाळाएवढा माणूस ‘शिवनाथ पुरुषोत्तम काळवीट’ या नावात तुम्हाला आमचे आभाळ सापडेल.

 

वर्तमान

काळवीट मामा विषयीची फक्त भीती ची जागा आता आदरयुक्त भीतीने घेतली. मामांच्या छायेत माझे वडील मोठे झाले. त्याच्या छायेत मी देखील मोठा झालो. कालांतराने मामांशी संपर्क वाढला. सर्व काही सामान्य आणि तो एक दिवस काळ रात्र म्हणूनच उगवला. २६ जुलै २००८. आमचे बाबा गेले. पितृशोक. बाबा सरकारी नोकरदार. त्यांच्या पश्चात आई ला पेंन्शन मिळण्याचा मार्ग अतिशय खडतर. त्यात सरकारी काम सहा महिने थांब. या सहा महिन्यांचे तीन वर्ष झाली. त्या तीन वर्षात काळवीट मामांनी त्यांच्या सरकारी नोकरीच्या प्रचंड अनुभवाने यशस्वी रित्या मार्गदर्शकाची धुरा स्वीकारली. सरकारी कामाची पद्धत, त्यातले पत्रव्यवहार, लिखाणाचा मजकूर, त्यातील शब्दरचना. आपले म्हणणे मोजक्या शब्दात पण प्रभावीपणे कसे मांडावे ह्या सर्व देणग्या मला त्यांच्याकडूनच. पण पुढे पुढे फक्त पत्रव्यव्हाराने कामं जमेनाशी झाली. प्रत्यक्ष भेट करावी सरकारी दरबारी हे नित्याचेच झाले.

औरंगाबाद-परभणी-नांदेड असा त्रिकोणी प्रवास मामांसोबत अनेकदा केला. हा प्रवास फक्त रेल्वे रूळांवरती सुकर वाटत असे. शहराच्या एका टोकापासून येऊन पहाटे ४.३० वाजताची गाडी पकडणे म्हणजे खायची गोष्ट नव्हती. बरं प्रत्येकवेळी तिकीट बुक करण्या इतपत पैसे नसत. मग आमची स्वारी जनरल डब्यात. तोबा गर्दी. बसायला सोडा उभं राहायला भेटलं तरी नशीब. आई ला लेडीज म्हणून जागा मिळत जाई कधी-कधी. मी उभा राहणे ठीक एकवेळ. पण मामा? मामानं देखील टॉयलेट रूम च्या मधल्या जागी उभं राहावं लागे. किती वेळ? 3 तास! सेवानिवृत्त झालेला माणूस!! पुत्रशोक झालेला माणूस!!!

साल २०१५. त्या दिवशी काळजाला छेद देणारी घटना घडली. अनुकंपा यादीतील माझं नाव वर येईना. मामांनी मला सोबती घेतले. थेट नांदेड गाठलं. महत प्रयासातून जिल्हाधिकारी साहेबांची भेट ठरली. “साहेब, माझ्या भाच्या ला तुमच्या पदरी घ्या.” भेटीतले हे पहिले वाक्य मामांचे. हाथ जोडलेले. त्या दिवशी मी आभाळ झुकताना पहिले. माझ्यासाठी! नातवासाठी!!

 

संध्याकाळ

       वक्त बडा बलवान है भैया! आज तारीख साक्ष आहे. वरील सर्व घटना लाल फितीत बंद होत्या. पण कोणी कोणासाठी थांबत नाही तसं मला देखील थांबता आले नाही. नोकरीला लागलो. लग्न झाले. मी मोठा झालो आणि मामा खचत गेले. आजकल मामा आमच्या घरी चक्कर सुद्धा मारत नाहीत. ऐकलं आहे तोल जातो म्हणे चालायला गेलं की. पण एकेदिवशी चालत आले. स्वतः आणि बिन आधाराचे. माझं बाळ पाहायला. सोफ्यावर बसले. मी खूप विनवण्या केल्या पण ते काही त्याला जवळ घेईनात. “अर्रे माझ्या म्हाताऱ्याचे हाथ थरथरतात आता. पोर सुटेल हो तुझं माझ्या हातून.” “सुटू देत. पण, मामा तुम्ही माझ्या लेकराच्या डोक्यावर हाथ ठेवा. कारण तुम्ही बाबांच्या डोक्यावर हाथ ठेवलात तर मी इथंवर येऊन पोहोचलो आणि जर तुम्ही त्याच्या डोक्यावर हाथ ठेवलात तर तो या जगाला गवसणी घालेल.” असं म्हणून १५ दिवसांचा तो गोळा मी त्यांच्या हाती ठेवला.

       आज आत्याच्या घरी पुरणाचा स्वयंपाक. घरी नेहमीप्रमाणे आरत्या-आवर्तने, स्वयंपाकघर घमघमलेलं आणि बाकी घर जमजमलेलं. पण मामा आता पार थकले आहेत. आज त्यांच्या समोरच जेवलो. त्यांची स्थित प्रज्ञ नजर माझ्यावर होती असं मानून चित्रावती घातली. वदनी कवळ घेता म्हणालो. पण मामा, मी माझं पान पूर्ण संपवलं नाही. मी ते माझ्या आई च्या पदराला बांधुन नेण्याच्या तुमच्या आवाजाची वाट पाहतोय.

-तुमचा पहिला नातू.

 

                                                                                                                                                            -प्रतिक चांदगावकर

Monday, December 22, 2025

वारी

                    ही झोपमोड अटळ होती. कारण टाळ-मृदंगाचा आवाज आणि हरिनाम हे काही रोज-रोज ऐकू येत नाही. डोळे किलकिले करत मोबाईल बघितला - पहाटे ४ च्या आसपास. आमच्या गॅलरी मधून सोलापूर हाय-वे साफ दिसतो. चंद्रभागे स्नान करून दिंड्या-पताका याचा दिशेने येत होत्या. नंतर उजाडले तेव्हाच जाग आली. तोच सौ. चा आवाज 'अहो आवरा लवकर ती लोकं यायची वेळ झालीये.' अर्धा-पाऊण तासांत जिकडं-तिकडं करून खाली पार्किंग मध्ये आलो. कमिटी मेंबर्स वारकरी वेशात घोळका करून उभी. वेष च तो. आपण वाघाची कातडी पांघरली म्हणून काय आपण वाघ होत नाही. चेयरमन साहेबांनी राजगिरा लाडू, उपवासाचा चिवडा, केळी इत्यादी-इत्यादी जिन्नसांचा तोबरा भरून वारकऱ्यांची स्वागताची सोया उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. स्थानिक भावी पंतप्रधानांनी चहा पिऊन त्यांस फुर्रर अनुमोदन दिले. कैक वर्ष जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज आणि माऊली श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच मार्गाने पांडुरंगाच्या दिशेने रवाना होते आणि त्याच साठी स्वागत अट्टाहास.

                    ठरल्या प्रमाणे १०० वैष्णव आमच्या सोसायटीत आले. काही वेळ माउलींचा विसावा इथेच होता. आम्ही माणसं वाटून घेतली. माझ्या वाटेल ६-७ जण आली. वर घरी घेऊन आलो. हो-नाही करत सगळ्यांनीच नाश्ता केला. ओळख करून घेण्यात कळलं की त्यांच्यातील एका आजी-आजोबांच्या एक-एक डोळ्यात मोती पडला होता. आजोबा सांगत होते “६ एक महिन्यापूर्वी डोळ्यांचं ऑपरेशन करायचं म्हणून मुलगा पुण्यात घेऊन आला. एके दिवशी आळंदी ला घेऊन आला. दर्शन झाल्यावर म्हणाला तुम्ही इथेच बस मी तुमच्या साठी ज्युस घेऊन येतो. तो जो गेला तो आतापस्तुर आला नाही. तो आम्हाला सोडून गेला का त्यानं आम्हाला सोडलं हे आजवर आम्हा म्हातारा-म्हातारी ला ठावं नाय. पण कोणाचं नशीब त्याला कोणाच्या दारापुढं उभा करत याचा हिशेब वर त्याच्या कड असतुया. पोरांना सोडलं त्याच्या तिसऱ्याच दिसी मंदिराकडची माणसं आली. म्हणाली, माऊलीची पालखी निघणार हाय ६ महिन्यानंतर, देखभाली साठी मदत करणार का?” शेजारी आजीबाई असावं टिपत होती. प्रसंगावधान दाखवत हिने ओटी भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मी पण पुरुषमंडळींना आहेर केला. तेवढ्यात पाऊस आला. मी सर्वाना थोड्या वेळाने निघण्याची विनंती केली. लागोलाग आजोबा म्हणाले, “नगं रे बाबा, ह्यो पाऊस म्हंजी त्याचा सांगावा हाय. आता निघाया पाहिजी”. निर्मात्याने माझ्या दीड वर्षाच्या मुलाच्या मेंदूत काय भरले असेल त्याच त्याला ठाऊक पण इतक्या वेळ चकार शब्द न काढलेलं लेकरू “आबा” म्हणलं. म्हातारीला अचानक भरून आलं. तिने त्याला आपल्या छातीची कवटाळून पापा घेतला अन कुठूनशी २० ची एक नोट काढून पोराच्या हातात कोंबली. नोट मळकी पण ओली होती. मोजून दीड तासांचा हा विसावा.

                    मग शिलेदाराने परत एकदा मोजदाद केली. बरोबर १००! त्याने “चला माऊली” अशी हाक देताच हरिनामाचा एकच गजर झाला. अचानक हाय-वे वर गर्दी वाढली. अलोट गर्दी. किती असेल? हजार? लाख? शासन सुद्धा मोजण्याच्या भानगडीत पडत नाही. बरं या गर्दीत कोण नाही?. अगदी आईच्या अंगावर असणारे बाळ पासून काठी टेकवत चालणाऱ्या व्यक्ती, बाया-माणसं, शिकलेले-अडाणी. या सर्वांमध्ये एकच बाब कॉमन, ते सगळे एकशिस्थ होते. कुठेही गडबड गोंधळ नाही बेदरकारपणा नाही. ओठांतून पडणारा एक-एक शब्द कसा एकसूर-एकताल-एकबद्ध. एवढा मोठा जनसमुदाय एकच नामघोषात, एकच दिशेने, एकच आशेने मार्गक्रमण करण्याची नोंद जगाच्या पाठीवर या व्यतिरिक्त कोठेही नाही. या वारकऱ्यांना आता इथून पुढे २०० कि.मी. पुढे पायी चालत जायचे आहे. पावसात!!  भीती नाही वाटत? भूक नाही लागत? झोपायचं कुठे? बरं हे जे जातायत त्यांच्या सगळ्यांचे मुख दर्शन होणारे का खरंच? मुळात जातात का? नाही-नाही या प्रश्नांचे उत्तरे पाहिजे असतील तर या जन्मी एकदा तरी वारी करावीच हे म्हणतात ते खरंच. आणि एवढं करून नाहीच भागलं तर तो आहे ... उभा आहे तिथे.

                    आता रस्त्यावरील सगळ्यांच्या माना एकच दिशेने वळाल्या, स्तब्ध, निशब्द, वातावरण एकदम मंतरलेलं, हात एकटवलेले. “आली-आलीपुटपुटत आम्ही पण पुढे सरसावलो. 'जगद्गुरू' 'माऊली' पादुकास्पर्श झाला!! सुखावलो. तास झाले, पण पादुकास्पर्श झालेल्या हाताला सुगंध तसाच आहे. आज मी हाथ धुणारचं नाही असं ठरवलंय. आमच्या एरियातून पालखींच्या वाटा वेगळ्या होतात. भेट मात्र पंढरपुरताच. आपल्याला पण शेवटी तिथेच जायाचं, वाटा तेवढ्या वेगळ्या.

|| जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ||

 

                                                                                                                                             -प्रतिक चांदगावकर

Friday, March 15, 2024

शो मस्ट गो ऑन


‘. . . it was really nice working with you guys.’ मेल ची शेवटची लाईन टाईप करून त्याने ‘Draft’ सेव्ह केला. आज ऑफिस ला गेल्या गेल्या मॅनेजर च्या तोंडावर ‘Resign’ फेकून मारायचं असा विचार करून नीरज ने बाईक स्टार्ट केली. इतक्या दिवस ‘मी रिजाईन का करू?’ असा विचार करणारा ‘मी रिजाईन का करू नये?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल गाडीचा एक-एक गियर टाकत होता आणि प्रत्येक ब्रेक सोबत एक कचकचून शिवी हासडत होता. कारण काय तर वर्क प्रेशर, मॅनेजर चे बोलणे, वीकेंड ला मिटींग्स व काम, त्यामुळे बिघडलेला ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ आणि या सर्वांमुळे आलेले ‘Frustration’. पण आज एवढं चिडण्याचे कारण निराळंच होत. आज नीरजच्या लग्नाचा वाढदिवस. आपला हा पंचवार्षिक सोहळा बायकोसोबत साजरा करण्याचा बेस्ट प्लॅन त्याने तयार केला होता. बरं बायकोच्याही १५ दिवस आधी त्याने तो मॅनेजरला सांगितलेला. कारण, ऐन वेळेला ‘कॉल’ नको. पण काळ संध्याकाळी माशी शिंकलीच. ‘Client Demo’ च्या नावाखाली उद्या ऑफिस ला बोलावणं आलं. बरं, याने हाफ डे साठी विचारणा केली तर मॅनेजर ने उलट रोजच्या वेळेआधी हजार हो असं फर्मान सोडलं. गाडी आणि विचार ऑफिस पार्किंग मध्ये येऊन थांबले.

‘Punch-in’ करून जागेवर जाताना हळूच मॅनेजर च्या केबिन मध्ये त्याने डोकावले. नव्हता आला अजून. खुर्चीवर बसणार तोच पाठीवर धप्पा! कोण? ‘अरे भाई आज चक्क आमच्या टाईम आलास! क्या बात है?’ मग त्याला काल च गुऱ्हाळ ऐकवलं. ‘चलता है रे इतना टेन्शन नही लेने का’ अशी दर्पोक्ती सोडून राहुल केसरकर त्याच्या डेस्क वर गेला. या राहुल्याच काय जातंय असं म्हणायला. याच सगळं सेट आहे. १० वर्षे बाहेर राहून मस्त छापून आलाय आणि इथं मला शहाणपणा शिकवतोय. २०-२५ मिनिटं अशीच गेली. अचानक काहीतरी आठवून नीरज ने राहुल्याला हाक मारली. ‘अरे तुझ्या टीम मध्ये १ महिन्यापूर्वी एकजण जॉईन झाला होता ना, तो पोरगा कुठाय? बरेच दिवस झालं दिसला नाही कुठे. काय गेला का सोडून?’ राहुल पण हसला. खरं तर असं झालं देखील होत पूर्वी की जॉईन झालेला एम्प्लॉई १-२ आठवड्यानंतर कंपनी परस्पर सोडून गेलेला. एकदा तर असं झालं की एक जण जॉइनिंग फॉर्म भरता-भरता बाहेर एक चक्कर टाकून येतो म्हणाला, तो जो गेला परत आलाच नाही! ‘आनंद’ राहुल म्हणाला. ‘आनंद नाव आहे रे माझ्या नव्या टीम-मेट च आणि तो सोडून वगैरे नाही गेलाय.’ आणि अचानक त्याचा स्वर खोलात गेला. ‘अरे त्याच बाळ गेलं रे’.

‘गेलं? म्हणजे? गेलं म्हणजे गेलं’ राहुल ने वर बोट दाखवत इशारा केला. ‘तो आज लंच नंतर जॉईन पण होणार आहे.’ हातातल्या कपातील गरम कॉफी कानात ओतल्याच नीरज ला भास झाला. पुढे दोघांनाही काही बोलवेना. नीरजचं सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. बोलण्याच्या नादात १० कधी वाजले कळलंच नाही. नीरज client demo ला गेला. demo मध्ये तो होताच कुठे पण! त्याला तर फक्त ‘आनंद’ दिसत होता. आनंद च पूर्ण नाव ‘आनंदम कृष्णमूर्थी’. अगदी नावाप्रमाणेच आनंदी कृष्णवर्णीय. जॉईन झाल्याच्या अगदी तिसऱ्याच दिवशी निम्मा स्टाफ त्याच्या खिशात होता. जॉइनिंग च्या दिवशी त्याने ऑफिसभर पेढे वाटले. दुसऱ्या दिवशी त्याच्या कडचा खास साऊथ इंडियन पदार्थ ‘पुट्टु’ लंच मध्ये पूर्ण टीम साठी आणला. त्याच्या हिंदी ला साऊथ इंडियन टच असल्यामुळे त्याच बोलणं ऐकायला नेहमीच मजा यायची. ‘. . . and thank you for joining folks.’ demo मध्ये मॅनेजर च समारोप वाक्य झालं तरी नीरज काही थाऱ्यावर नव्हता. लंच आणि त्यानंतर पार्किंग मध्ये अर्धा पाऊण तास फेर-फटका हा रोजचाच नित्यक्रम. पार्किंग मधून परत वर येताना त्याची नजर Nexon वर गेली. म्हणजे हा पठ्ठया खरंच जॉईन झाला तर. पायऱ्या चढतांना नीरजने डोक्याला जरा ताण दिला, बरोबर २२ दिवसांनी आनंद परतला होता. खुर्चीवर बसतांना त्याने पक्क ठरवलं, आनंद ला आज काहीच बोलायचं नाही. आजचा दिवस पार पडला कसातरी. पडला कसला, तब्बल २ तास लेट झाला ऑफिस सोडायला.

दार उघल्याच्या क्षणी ‘बाबा’ म्हणत त्याच्या २ वर्षाच्या गोळ्याने पायाशी लोळण घातली. खाऊ खाल्ल्याने झालेलं खरकटं तोंड, सर्दी मुळे शेवाळलेले नाक, नीरज ने तसाच त्याला उचलला. ‘चला आपल्याला भुर्र्र जायचं आई ला आवरायला सांग’. त्याने बायकोला हाक दिली. ‘तेजू, चल यावर पटकन, फार काही नाही पण जेऊन येऊ बाहेरून.’ बाहेर? ‘एकदा नाही म्हणल्यावर की काही येत नसते कुठे. हवं तर तुझ्या पहिल्या बायकोला, मॅनेजर ला घेऊन जा डिनर डेट वर.’ तेजू फणकाऱ्यात म्हणाली. साम-दाम-दंड-भेद. शेवटी तिला यावंच लागलं. ती आली खरी. पण, तिचा राग मात्र तसू देखील कमी झाला नव्हता. पण बायको म्हणून नवऱ्या मधला बदल तिने बरोबर हेरला. सकाळी हाच तिला ‘आज नोकरीचा शेवटचा दिवस.’ असं सांगून गेला होता आणि आता जेवताना demo बद्दल बोलतोय काय, कंपनी आणि मॅनेजर च कौतुक ते काय. घरी यायला उशीरच झाला तसा त्यांना. पोराला झोपवल्यानंतर न राहून तेजू ने नीरजला विचारलं ‘काय रे सकाळी ज्या तोऱ्याने निघाला होतास ते पाहून वाटलं नव्हतं आज जेवायला बाहेर घेऊन जाशील. दिवसभरात झालं काय असं?’ मग त्याने तिला आजचा पूर्ण ऑफिस क्रम वाचून दाखवला.

‘टी-टाईम पर्यंतचा वेळ कसाबसा ढकलला मी.’ नीरज पुढे सांगत होता. पण तितक्यात नीरज आणि आनंद ची नजरा-नजर झाली. त्या दिवशी नीराजला मानवी स्वभावातील अजून एक खासियत कळाली, आपल्याला नेहमी झाकलेल्या गोष्टींमध्येच रस फार. मन चिंती ते वैरी न चिंती. त्याने शेवटी विषयाला हाथ घातलाच आणि आनंद बोलू लागला. भावनेला भाषा नसते. आज नीरज ला कन्नड पण समजली असती. आनंद च लव्ह मॅरेज. लग्नाच्या ७ वर्षांनंतर गुड न्युज आली. त्याआधी नानाविध उपाय-उपचार केल्याचे तो सांगतो. परमात्म्याने संतती दान दिले पण ते अपुरे. बाळाच्या जन्मानंतर अवघ्या दीड वर्षांनी बाळाचा कॅन्सर थर्ड स्टेज ला असल्याचा रिपोर्ट आला. आनंद आणि त्याच्या बायकोसाठी ही एक अविश्वसनीय बाब होती. त्यानंतर त्यांनी आहे नाही ते सगळं पैसे बाळाच्या उपचारांसाठी लावले. देव संपले पण नवस संपले नाहीत. 'Chemotherapy'. ते प्रकाश किरण त्या एवढुश्या जिवाच्या शरीरावर पडताना डॉक्टरच्या सुद्धा हृदयाला पीळ पडत होता तिथे त्या आईची अवस्था न विचारणं योग्य. आपला पोटचा गोळा हा असा कणा-कणाने आपल्या पासून दूर होतोय हे ती आपल्या तुटलेल्या अंतःकरणाने पाहत होती. ‘अरे मग तू जॉईनच का झालास? या वेळी तुझ्या बायकोला सर्वात जास्त तुझी गरज आहे.’ नीरज ने विचारलं. आनंद म्हणाला ‘अरे बाळ गेलं त्या दिवसापासून तिने अन्नाचा कण घेतला नाही. पाण्याकडे पाहिलं देखील नाही. ५ दिवसानंतर ही पण आपल्याला सोडून जाते की काय असं वाटून गेलं एवढे तिचे हाल. मग १० व्याच दिवशी तिला या सगळ्या वातावरणातून इकडे घेऊन आलो. तिलाही जॉब आहेच. तिलाही बळजबरीने जॉईन करायला लावले आणि मी पण जॉईन झालो. परमेश्वराने एक सुख ओरबाडून नेलं, पण माझ्या आयुष्यातलं प्रेमच जर हिरवल गेलं तर कदाचित मीच जगू शकणार नाही आणि आज मी जर रडत बसलो तिने कोणाच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडायचं?’

नीरज चे थरथरणारे हाथ तेजू ने आपल्या हातात घेतले. त्याचे डबडबलेले डोळे तिने साडीच्या पदराने पुसले. ‘उद्देश, आनंदच्या आयुष्यात आपल्या बायकोसाठी जगण्याचा उद्देश आहे तेजू. त्याच्या प्रत्येक वाक्यानंतर मला एकच कडवं आठवत होतं, दुनिया में कितना ग़म हैं मेरा ग़म कितना कम हैं’ नीरज बोलायचं थांबला नव्हता. ‘आपल्या २ वर्षाचं लेकरू आपल्या समोर जग सोडून गेलं हे मनावरचं ओझं वाहणारा आनंद, त्याच्या सारखा लोहपुरुष माझ्या पाहण्यात नाही. तुला माहिते आहे तेजू आनंद जाताना मला काय म्हणाला, लाईफ इज ए शो अँड शो मस्ट गो ऑन.’ ‘आणि तो ‘Resign चा मेल?’ तेजू ने विचारलं. ‘तो? अगं मी ऑफिस पार्किंग मध्ये गाडी काढत असतांना Nexon वर आनंदच्या बाळाचं नाव वाचलं तेव्हाच डिलीट केला.’

 

                                                                                                  -प्रतिक चांदगावकर