Disclaimer : सदर लिखाण हे लेखकाचे वैयक्तिक मत, काल्पनिक आणि काही प्रमाणात स्व:नुभवातून लिहिले गेले असून त्याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

Monday, December 22, 2025

वारी

                    ही झोपमोड अटळ होती. कारण टाळ-मृदंगाचा आवाज आणि हरिनाम हे काही रोज-रोज ऐकू येत नाही. डोळे किलकिले करत मोबाईल बघितला - पहाटे ४ च्या आसपास. आमच्या गॅलरी मधून सोलापूर हाय-वे साफ दिसतो. चंद्रभागे स्नान करून दिंड्या-पताका याचा दिशेने येत होत्या. नंतर उजाडले तेव्हाच जाग आली. तोच सौ. चा आवाज 'अहो आवरा लवकर ती लोकं यायची वेळ झालीये.' अर्धा-पाऊण तासांत जिकडं-तिकडं करून खाली पार्किंग मध्ये आलो. कमिटी मेंबर्स वारकरी वेशात घोळका करून उभी. वेष च तो. आपण वाघाची कातडी पांघरली म्हणून काय आपण वाघ होत नाही. चेयरमन साहेबांनी राजगिरा लाडू, उपवासाचा चिवडा, केळी इत्यादी-इत्यादी जिन्नसांचा तोबरा भरून वारकऱ्यांची स्वागताची सोया उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. स्थानिक भावी पंतप्रधानांनी चहा पिऊन त्यांस फुर्रर अनुमोदन दिले. कैक वर्ष जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज आणि माऊली श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी याच मार्गाने पांडुरंगाच्या दिशेने रवाना होते आणि त्याच साठी स्वागत अट्टाहास.

                    ठरल्या प्रमाणे १०० वैष्णव आमच्या सोसायटीत आले. काही वेळ माउलींचा विसावा इथेच होता. आम्ही माणसं वाटून घेतली. माझ्या वाटेल ६-७ जण आली. वर घरी घेऊन आलो. हो-नाही करत सगळ्यांनीच नाश्ता केला. ओळख करून घेण्यात कळलं की त्यांच्यातील एका आजी-आजोबांच्या एक-एक डोळ्यात मोती पडला होता. आजोबा सांगत होते “६ एक महिन्यापूर्वी डोळ्यांचं ऑपरेशन करायचं म्हणून मुलगा पुण्यात घेऊन आला. एके दिवशी आळंदी ला घेऊन आला. दर्शन झाल्यावर म्हणाला तुम्ही इथेच बस मी तुमच्या साठी ज्युस घेऊन येतो. तो जो गेला तो आतापस्तुर आला नाही. तो आम्हाला सोडून गेला का त्यानं आम्हाला सोडलं हे आजवर आम्हा म्हातारा-म्हातारी ला ठावं नाय. पण कोणाचं नशीब त्याला कोणाच्या दारापुढं उभा करत याचा हिशेब वर त्याच्या कड असतुया. पोरांना सोडलं त्याच्या तिसऱ्याच दिसी मंदिराकडची माणसं आली. म्हणाली, माऊलीची पालखी निघणार हाय ६ महिन्यानंतर, देखभाली साठी मदत करणार का?” शेजारी आजीबाई असावं टिपत होती. प्रसंगावधान दाखवत हिने ओटी भरण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मी पण पुरुषमंडळींना आहेर केला. तेवढ्यात पाऊस आला. मी सर्वाना थोड्या वेळाने निघण्याची विनंती केली. लागोलाग आजोबा म्हणाले, “नगं रे बाबा, ह्यो पाऊस म्हंजी त्याचा सांगावा हाय. आता निघाया पाहिजी”. निर्मात्याने माझ्या दीड वर्षाच्या मुलाच्या मेंदूत काय भरले असेल त्याच त्याला ठाऊक पण इतक्या वेळ चकार शब्द न काढलेलं लेकरू “आबा” म्हणलं. म्हातारीला अचानक भरून आलं. तिने त्याला आपल्या छातीची कवटाळून पापा घेतला अन कुठूनशी २० ची एक नोट काढून पोराच्या हातात कोंबली. नोट मळकी पण ओली होती. मोजून दीड तासांचा हा विसावा.

                    मग शिलेदाराने परत एकदा मोजदाद केली. बरोबर १००! त्याने “चला माऊली” अशी हाक देताच हरिनामाचा एकच गजर झाला. अचानक हाय-वे वर गर्दी वाढली. अलोट गर्दी. किती असेल? हजार? लाख? शासन सुद्धा मोजण्याच्या भानगडीत पडत नाही. बरं या गर्दीत कोण नाही?. अगदी आईच्या अंगावर असणारे बाळ पासून काठी टेकवत चालणाऱ्या व्यक्ती, बाया-माणसं, शिकलेले-अडाणी. या सर्वांमध्ये एकच बाब कॉमन, ते सगळे एकशिस्थ होते. कुठेही गडबड गोंधळ नाही बेदरकारपणा नाही. ओठांतून पडणारा एक-एक शब्द कसा एकसूर-एकताल-एकबद्ध. एवढा मोठा जनसमुदाय एकच नामघोषात, एकच दिशेने, एकच आशेने मार्गक्रमण करण्याची नोंद जगाच्या पाठीवर या व्यतिरिक्त कोठेही नाही. या वारकऱ्यांना आता इथून पुढे २०० कि.मी. पुढे पायी चालत जायचे आहे. पावसात!!  भीती नाही वाटत? भूक नाही लागत? झोपायचं कुठे? बरं हे जे जातायत त्यांच्या सगळ्यांचे मुख दर्शन होणारे का खरंच? मुळात जातात का? नाही-नाही या प्रश्नांचे उत्तरे पाहिजे असतील तर या जन्मी एकदा तरी वारी करावीच हे म्हणतात ते खरंच. आणि एवढं करून नाहीच भागलं तर तो आहे ... उभा आहे तिथे.

                    आता रस्त्यावरील सगळ्यांच्या माना एकच दिशेने वळाल्या, स्तब्ध, निशब्द, वातावरण एकदम मंतरलेलं, हात एकटवलेले. “आली-आलीपुटपुटत आम्ही पण पुढे सरसावलो. 'जगद्गुरू' 'माऊली' पादुकास्पर्श झाला!! सुखावलो. तास झाले, पण पादुकास्पर्श झालेल्या हाताला सुगंध तसाच आहे. आज मी हाथ धुणारचं नाही असं ठरवलंय. आमच्या एरियातून पालखींच्या वाटा वेगळ्या होतात. भेट मात्र पंढरपुरताच. आपल्याला पण शेवटी तिथेच जायाचं, वाटा तेवढ्या वेगळ्या.

|| जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ||

 

                                                                                                                                             -प्रतिक चांदगावकर

16 comments:

  1. अप्रतिम ….👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम रचना... हृदयाला स्पर्श करून जाणारे शब्दात सर्व काही मांडले आहे खूप छान 👈👏👍💐 जय हरी....
    सुलभा जाधव
    छत्रपती संभाजीनगर

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख..👍 वारी आनंदाची🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏

    ReplyDelete
  4. खूपच छान लिहिल आहे.... वाचतानी सगळ चित्र डोळ्या समोर दिसत होत... असंच लिहित रहा

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर शब्दबद्ध केले आहे, ही आर्त भावना भगवंताप्रति अवश्य असावी , असं या लिखाणातून चिंतनात घेता येईल,

    माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण, शब्दशब्द मोहविते, देहभान हरपते..

    नातरी बालक बोबडां बोलीं। कां वाकुडां विचुकां पाऊलीं। तें चोज करूनि माऊली। रिझे जेवीं॥" (माऊली भक्तांच्या अपूर्ण बोलण्यातही कसे आनंद घेतात हे दर्शवणारी)

    ReplyDelete
  6. वा वा खुप छान
    गौरी नरवाडकर

    ReplyDelete
  7. Very nicely written 👍

    ReplyDelete
  8. Very nicely written 👍

    ReplyDelete
  9. Jay Hari !!! Bhavnik vishayachi Atishay sundar shabdan sah surekh mandni !! Mastach!! Asech lihit raha.. ani ho,, ajun kahi lihile asel tr te dekhil share kara!👍👍

    ReplyDelete
  10. अतिशय उत्कृष्ट,सहज आणि सोप्या शब्दात लिखाण केले आहे, लेख वाचताना वारी चे व त्या आजी अजोबाचे चित्र डोळ्या समोर उभे राहते.

    चैतन्य बोठे

    ReplyDelete